Tuesday 9 August 2016

स्मरण ऑगस्ट क्रांती दिनाचे



बऱ्याच जणांना विचारले कि ९ ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवसाचे महत्व काय आहे तर काहीजण म्हणतात आज क्रांती दिन आहे. पण क्रांती दिन म्हणजे नेमके काय..? ऑगस्ट क्रांती म्हणजे काय..? एक चळवळ .. मग कसली चळवळ ....??? फारच कमी जणांना याबददल माहिती आहे जी कि त्यांनी इतिहासाच्या पुस्तकात आभ्यासली सुद्धा आहे पण सांगता येत नाही. त्या सर्वांसाठी......

                                                 स्मरण ऑगस्ट क्रांती दिनाचे .... 
                                                         ............आणि त्याला असलेल्या अनन्यसाधारण महत्वाचे.


 
 दुसऱ्या महायुद्धात पाठिंबा घेऊनसुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले नाही, तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी " छोडो भारत" आंदोलनाची हाक दिली. हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा होता. 'चले जाव' आणि ' करेंगे या मरेंगे' हे दोन स्फूर्तीदायक मंत्र  या लढ्याने दिले. या आंदोलनाची सुरुवात ९ ऑगस्ट १९४२ रोजी झाली होती. त्यामुळेच हा दिवस ' ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून पाळला जातो. मुंबईच्या ज्या गवालिया टेंक मैदानातून या आंदोलनास सुरुवात झाली, ते आता 'ऑगस्ट क्रांती मैदान' नावाने ओळखले जाते. या आंदोलनाची आखणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ४ जुलै १९४२ रोजी तयार केलेल्या प्रस्तावाने झाली. आणि ८ ऑगस्ट रोजी आखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात ' छोडो भारत' प्रस्ताव समंत करण्यात आला.

'छोडो भारत' प्रस्तावाची कुणकुण ब्रिटीश सरकारला लागली होती. सरकारने गांधीजींना ताब्यात घेवून पुण्याजवळील AAGAKHAN PALACE मध्ये ठेवले. कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांना नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले. नेते कैदेत असल्यामुळे आंदोलन होणार नाही, हा ब्रिटीशांचा अंदाज चुकला. तरुण नेत्या अरुणा असफअली यांनी गवालिया टेंक मैदानावर ठरल्याप्रमाणे ९ ऑगस्ट ला तिरंगा फडकावला आणि 'छोडो भारत' आंदोलनाचा  बिगुल वाजला. जागोजागी आंदोलने झाली. गांधीजीनी संपूर्ण आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले होते; मात्र ब्रिटीशांना आता हुसकावून लावायचेच, या ध्येयाने झपाटलेल्या काही जणांकडून हिंसक घटनाही घडल्या. अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाला हटविण्यात आले, अटक केलेल्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुरुंग फोडून मुक्तता करवून घेतली आणि जागोजागी प्रशासनाला उखडून स्वातंत्र्य प्रशासनाची घोषना केली. दुसऱ्या महायुद्धामुळे जर्जर झालेल्या ब्रिटीशांची या आंदोलनामुळे तारांबळ उडाली. देशभरात ठिकठिकाणी गोळीबार झाला. शेकडो कार्यकर्त्यांना हौतात्म्य आले. लाखो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली; परंतु तरीही आंदोलन विझले नाही. प्रत्येकाने नेता बनावे, हे गन्दिजींचे आवाहन तंतोतंत पाळण्यात येत होते. अटक केलेल्या नेत्यांचा बाह्यजगाशी सुमारे तीन वर्षे संपर्काच नव्हता, तरीही आंदोलन थांबले नाही, हे १९४२ च्या आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. 

अटकेत असलेल्या महात्मा गांधीनी आंदोलनकाळात प्रकृतीची पर्वा न करता २१ दिवस उपोषण केले. १९४४ मध्ये त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाल्यामुळे त्यांची ब्रिटीशांनी सुटका केली. तोपर्यंत ब्रिटीशांनी परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते; परंतु गांधीजी आणि काँग्रेसला या आंदोलनामुळे देशातील काही नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. १९४२ च्या आंदोलनाने 'आरपार लढाई' ची बीजे पेरली. ब्रिटीशांना हुसकावून लावल्या खेरीज स्वस्थ बसायचे नाही, या ध्येयाची ज्योत मनामनात चेतवली. भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही, हे ब्रिटीशांना कळून चुकले, ते याच आंदोलनामुळे. अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय होत होता. युद्धाची सूत्रेही अमेरिकेच्या हातात गेली होती. या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेवून, आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करून योग्य वेळी केलेलं आंदोलन म्हणूनही 'छोडो भारत' आंदोलनाला वेगळे महत्व आहे. हेच या आंदोलनाचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य होय. कॉंग्रेसच्या जुलै मधील बैठकीत जो प्रस्ताव तयार करण्यात आला , त्यात आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर टिप्पणी करण्यात आली होती. ८ ऑगस्ट च्या काँग्रेस समितीच्या अधिवेशनात हा प्रस्ताव समंत करतानाही परिस्थितीचा उहोपोह करण्यात आल्याचे दिसून येते. 'ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य करणे देशाच्या आणि जगाच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे समितीने म्हंटले होते.

स्वातंत्र्याप्राप्तीनंतरचे हंगामी सरकार कसे असेल, याचाही विचार समितीने केलेला होता. हे सरकार सर्व पक्ष आणि संघटनांच्या सहकार्याने बनेल आणि सर्व भागांतील जनतेचे प्रतिनिधित्व ते करेल. भारतावरील आक्रमणांचा अहिसांत्मक आणि लष्करी मार्गाने मुकाबला करून भारताचे संरक्षण करणे हे या सरकारचे प्राथमिक कार्य असेल. हे कार्य मित्रराष्ट्रांच्या सहकार्याने केले जाईल. शेती आणि कारखान्यांमध्ये कष्ट करणाऱ्यांच्या प्रगतीसाठी हे सरकार वचनबद्ध असेल. याच जनतेची भारतात खर्या अर्थाने सत्ता आहे. हंगामी सरकार घटना समितीची योजना तयार करेल व सर्व समाजघटकांना मान्य होईल आशी घटना तयार केली जाईल. घटनेत राज्यांना शक्य तेवढे स्वायत्त अधिकार दिले जातील, आशय अनेक भविष्य कालीन बाबींची योजना याच प्रस्तावात अंतर्भूत होती. तसेच परराष्ट्र धोरण काय राहील, हेही नमूद करण्यात आले होते. म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्यासाठी हा अंतिम लढा आहे, एवढे फक्त ठरवून स्वातंत्र्यलढयातील नेते थांबले नाहीत तर त्यांनी भविष्याच्या योजनाही आखल्या होत्या. याखेरीज स्वातंत्र्य मिळविणे हे या आंदोलनाचे ध्येय असले तरी केवळ भारतापुरता विचार न करता अनेक परतंत्र राष्ट्रांना पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळेच 'छोडो भारत' आंदोलन आणि ९ ऑगस्ट या क्रांती दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे.  
  
आपला आभारी.

जितेंद्र जगताप 
B.Com, LL.B
9619749203 
      

                


No comments: